पुणे : देशात शांतता, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे; तसेच आपल्याला शुद्ध हवा आणि पवित्र वातावरण मिळावे, या भावनेतून तुळशीच्या रोपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तुळशीचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. ही सर्व रोपे विद्यार्थी व शिक्षकांना वाटण्यात आली. संचालिका कॅप्टन शालिनी नायर, प्रा. अंकित जैन, प्रा. अमोल गुप्ते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, भारतीय सीमांच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच मुलांना तुळशीचे महत्त्व समजावे व त्यांना वृक्षांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तुळस ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. गेल्या हजारो वर्षांपासून अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तुळशीची पूजा आपण करतो. तुळस हे शांततेचे प्रतीक असून, भारताच्या चहुबाजूनी सीमेलगत ही तुळशीची रोपे लावायला हवीत. त्यातून शांततेचा संदेश जाईल.’
वर्षा उसगावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘तुळस ही आपल्यासाठी अतिशय जवळची आहे. आपल्या अंगणात असलेल्या तुळशीमुळे घराचे वातावरण प्रसन्न व शुद्ध राहते. तुळस औषधी वनस्पती असून, तिचे अनेक फायदे आहेत. औषंधापासून ऑक्सिजनपर्यंत सर्व गोष्टी देणाऱ्या तुळशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे’.